loader
Breaking News
Breaking News
Foto

वणोशीत ‘मित्रा’ची कमाल! कृषी दूतकन्यांनी उलगडले शाश्वत शेतीचे गुपित; ‘ट्रायकोडर्मा’ प्रात्यक्षिकाला शेतकर्‍यांचा उदंड प्रतिसाद

(दापोली- सागर गोवळे) दापोली वणोशी- ग्रामीण जागृती कार्यानुभव (ठAथए) कार्यक्रमांतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संचलित कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषी स्नेही’ गतातर्फे वणोशी तर्फ पंचनदी येथील बौद्धवाडी येथे ‘ट्रायकोडर्मा’ या मित्रबुरशीच्या वाढीचे व वापराचे थेट प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले. रासायनिक बुरशीनाशकांवरील खर्च कमी करून जैविक पद्धतीने पिकांचे रक्षण करण्याचे तंत्रज्ञान कृषी कन्यांनी स्थानिक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवले. कसे तयार करायचे ट्रायकोडर्मायुक्त शेणखत? प्रात्यक्षिकादरम्यान कृषी कन्यांनी अत्यंत सोप्या भाषेत जैविक खत तयार करण्याची पद्धत शेतकर्‍यांना दाखवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साहित्य - १० किलो चांगले कुजलेले शेणखत, ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा कल्चर आणि आवश्यकतेनुसार पाणी. कृती - सावलीच्या ठिकाणी शेणखत पसरवून त्यात ट्रायकोडर्मा कल्चर व्यवस्थित मिसळण्यात आले. योग्य आर्द्रता राखून हे मिश्रण झाकून ठेवण्यात आले. महत्त्वाची काळजी - ट्रायकोडर्माच्या चांगल्या वाढीसाठी थेट सूर्यप्रकाश टाळणे आणि योग्य प्रमाणात दमटपणा (आर्द्रता) राखणे अत्यंत गरजेचे असते. मित्रबुरशी कार्य कशी करते? ट्रायकोडर्मा ही पिकांसाठी वरदान ठरवणारी मित्रबुरशी आहे. ती माती आणि बियाण्यांतून पसरणार्‍या घातक बुरशीजन्य रोगांचा नायनाट करते: रोगकारक शत्रू बुरशींशी अन्न व जागेसाठी स्पर्धा करणे. शत्रू बुरशींवर परजीवी स्वरूपात आक्रमण करून त्यांना नष्ट करणे. प्रतिजैविक पदार्थ व लायटिक एन्झाइम्सची निर्मिती करून पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे. विविध पिकांसाठी उपयुक्त हे जैविक खत भात, नाचणी, कडधान्ये, भाजीपाला यांसह आंबा, काजू, नारळ, केळी, पपई, ऊस आणि तेलबिया पिकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे पिकांच्या मुळांची जोमदार वाढ होते आणि जमिनीचे आरोग्य सुधारते.

टाइम्स स्पेशल

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी दूतकन्या श्रावणी मोरे, साक्षी लोके, समृद्धी जाधव, तन्वी नादिवडेकर, कोमल झिरवाळ, नीलम मदने, आकांक्षा गाडगे, श्रुती बोबडे, अंकिता मुंज व सलोनी सावंत यांनी विशेष मेहनत घेतली. सदर प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. परेश पोटफोडे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या प्रात्यक्षिकामुळे वणोशी परिसरातील शेतकर्‍यांमध्ये पर्यावरणपूरक, कमी खर्चाच्या आणि शाश्वत शेतीबाबत नवी चेतना निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg