loader
Breaking News
Breaking News
Foto

धामणसेंतील महिलांनी जोडला जवानांच्या मनगटाशी मायेचा धागा!

धामणसें : रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नव्हे, तर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचीही एक भावनिक संधी आहे, याची जाणीव करून देणारा अनोखा उपक्रम धामणसें ग्रामपंचायतीच्या वतीने ‘एक राखी जवानांसाठी’ या उपक्रमातून साकारला. देशाच्या सीमेवर आपल्या कुटुंबापासून दूर राहून राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांच्या मनगटावर धामणसेंतील महिलांच्या हातांनी तयार केलेली राखी बांधली जावी आणि त्यातून ‘तुम्ही देशाचे रक्षण करता, आम्ही तुमच्यासोबत आहोत’ हा आपुलकीचा संदेश जवानांपर्यंत पोहोचावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत धामणसें गावातील संस्कृती ग्रामसंघाअंतर्गत २६ महिला बचत गट तसेच धामणसें माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिलांनी आणि विद्यार्थिनींनी जवानांसाठी तब्बल २६० राख्या तयार करून पाठविल्या. विशेष म्हणजे राख्यांसोबत विद्यार्थिनींनी जवानांसाठी प्रेम, आदर आणि शुभेच्छा व्यक्त करणारी शुभेच्छापत्रेही तयार केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राखी संकलनाच्या वेळी धामणसेंतील २६ बचत गटांचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना उपस्थितांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय जवान, जय किसान’ अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. या घोषणांमुळे कार्यक्रमस्थळी उत्साह, राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. महिलांसोबत विद्यार्थिनींनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थिनींना जाणीवपूर्वक सहभागी करून घेण्यात आले. देशभक्ती केवळ राष्ट्रीय सणांपुरती मर्यादित न राहता लहान वयापासूनच विद्यार्थिनींच्या मनात देश, राष्ट्रध्वज आणि भारतीय जवानांविषयी आदर व कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, हा या सहभागामागील प्रमुख उद्देश होता. सीमेवर तैनात असलेला जवान हा कोणाचातरी भाऊ, मुलगा, पती किंवा वडील आहे. तो आपल्या कुटुंबापासून दूर राहून संपूर्ण देशाचे रक्षण करतो. त्यामुळे त्याच्या मनगटावर धामणसेंतील एका मुलीने किंवा महिलेने बांधलेली राखी ही केवळ धाग्याची नसून आपुलकी, कृतज्ञता आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोडणारी राखी ठरणार आहे.

टाईम्स स्पेशल

“देशाच्या सीमेवर आपल्या कुटुंबापासून दूर राहून राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. महिला बचत गट आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत २६० राख्या जवानांसाठी पाठविल्या, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासोबतच जवानांप्रती आदर आणि आपुलकी व्यक्त करण्याची संधी मिळाली,” असे त्यांनी सांगितले. धामणसें ग्रामपंचायतीच्या या उपक्रमातून रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या जवानांशी भावनिक नाते जोडणारा सण ठरला. धामणसेंतील गृहलक्ष्मी महीला स्वयंसहाय्यता समूह यांनी तयार केलेल्या राख्या जवानांपर्यंत पोहोचवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg