loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील उड्डाणपूलाच्या काँक्रिट प्लेटस् सॉईल नेलिंग करण्याचे काम सुरु

लांजा (संजय साळवी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहरातील उपशेट्येवाडी येथे गेल्या महिन्यात उड्डाणपुलाच्या भिंतीच्या सिमेंट काँक्रीट प्लेट्स अचानक सैल होऊन बाहेर आल्याचे समोर आले होते. या प्रकारानंतर नागरिकांनी तीव्र संताप केला होता, ज्याची दखल घेत अखेर संबंधित ठेकेदार कंपनीने शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी सॉइल नेलिंग करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मुंबई - गोवा महामार्गाचे लांजा शहरातील रखडलेले काम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहे. अशातच लांजा शहरातील उड्डाणपुलाच्या भिंतीला सिमेंट काँक्रीटच्या प्लेट्स बसविण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या महिन्यात सिमेंट काँक्रीटच्या प्लेट्स जागेवरून सरकून बाहेरील बाजूला आल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे उड्डाणपुलाच्या मजबुतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेनंतर नागरिकांनी आणि वाहनचालक यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. तर कोट्यवधी रुपये खर्च करूनही महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू आहे का? असा थेट सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला होता. विशेषतः सर्व्हिस रोडवरील खड्डे, फुटपाथ, गटारे व अंडरपास अशा विविध विषयांमुळे लांजातील नागरिक त्रस्त असताना उड्डाणपुलाच्या प्लेट्स सरकणे हा वाहनचालकांसाठी धोकादायक विषय बनला होता. अखेर या सगळ्या पार्श्वभूमीवर ठेकेदार कंपनीला जाग आली असून त्यांनी शुक्रवारी १४ ऑगस्टपासून उपाययोजना सुरू करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

उड्डाणपुलाच्या निखळलेल्या प्लेट्स पूर्णपणे कोसळू नयेत म्हणून ठेकेदार कंपनी उपाययोजना म्हणून सॉइल नेलिंग करत आहे. यामुळे कमकुवत झालेल्या प्लेट्सच्यामधून लांब स्टीलच्या चार सळ्या थेट पुलाच्या आतील मजबूत भरावापर्यंत मशीनच्या सहाय्याने ड्रिल करून ३० फूट आत घुसविल्या जात आहेत. त्यांनतर सिमेंटच्या मिश्रणाने ते आत घट्ट केले जाणार असून त्यामुळे त्या प्लेट्स बाहेर सरकणे थांबेल, असे ठेकेदार संबंधित कंपनीच्या अधिकार्‍याने सांगितले. दरम्यान, नागरिकांच्या रोषानंतर काम सुरू केले असले तरी पावसाळ्यात किंवा भविष्यात वाहतूक सुरू होईल तेव्हा जड वाहनांमुळे आतील माती भुसभुशीत झाली असल्यास केवळ नेलिंग करून किती सुरक्षितता राहील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणार्‍या चाकरमान्यांची व भविष्यातील वाहतूक सुरक्षित राहण्यासाठी ठेकेदार कंपनीने पुलाचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg