loader
Breaking News
Breaking News
Foto

निवळीत कर्तृत्वाचा सन्मान; स्वराज प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम; सरपंच, उपसरपंचांचे कौतुक

निवळी : गावाच्या विकासासाठी केवळ विकासकामे करणे पुरेसे नसून गावासाठी योगदान देणाऱ्या योग्य व्यक्तींची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच विचारातून स्वराज प्रतिष्ठान निवळी आणि निवळी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. कर्तृत्वाची योग्य वेळी दखल घेऊन योग्य माणसांना निवडून त्यांचा सन्मान करणे ही गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दूरदृष्टीची बाब आहे, असे या उपक्रमातून अधोरेखित झाले. या सोहळ्याला हातखंबा जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, हातखंबा पंचायत समिती गणाच्या सदस्या विद्याताई बोंबले, निवळीच्या सरपंच तन्वी कोकजे, स्वराज्य प्रतिष्ठान संस्थापक व अध्यक्ष निवळी गावचे उपसरपंच संजय निवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे यांनी स्वराज प्रतिष्ठान आणि निवळी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. गावातील विद्यार्थी, माजी सैनिक, महिला, ग्रामपंचायत कर्मचारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक तसेच विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींचा एकाच व्यासपीठावर सन्मान करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळते आणि इतरांनाही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. गावाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास केव्हाही हाक द्या, आपण त्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी सरपंच तन्वी कोकजे आणि उपसरपंचांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमात घेतलेला पुढाकारही विशेष कौतुकास्पद ठरला. गावातील कर्तृत्ववान व्यक्तींची निवड करून त्यांचा सन्मान करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणताना ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्रामपंचायत आणि स्वराज प्रतिष्ठान यांनी एकत्र येऊन राबविलेल्या या उपक्रमामुळे गावातील विविध घटकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम झाले.

टाईम्स स्पेशल

या गुणगौरव सोहळ्यात शिष्यवृत्ती तसेच नवोदय परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा, माजी सैनिकांचा, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. गावातील बचत गट तसेच बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभारून स्वावलंबी झालेल्या उद्योजक महिलांचाही गौरव करण्यात आला. नॅशनल सायकलस्वार रावणंग तसेच नुकतीच पोलीस विभागात भरती झालेल्या पल्लवी बाईत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीला सेवा देणारे तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य विभागातील अधिकारी, गावचे पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, रिक्षा व्यवसायिक आणि व्यापारी संघटना निवळी यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व दप्तरे देण्यात आली. महिलांना साड्या, पुरुषांना शाल-श्रीफळ, तर सर्व सन्मानार्थींना प्रशस्तीपत्रक आणि स्वराज प्रतिष्ठान व निवळी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुयोग कांबळे, विद्याताई बोंबले आणि सरपंच तन्वी कोकजे यांनी मनोगत व्यक्त करून सर्व सन्मानार्थींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अधिकारी श्रद्धा शिवगण, संगणक परिचालक विद्या शेवडे, शिपाई संतोष सावंत, शिपाई मोहन सावंत आणि शिपाई सचिन रावणंग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg