loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणी कवी रोजारीओ पिंटो यांच्या 'मॉ मेरी' या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

मालवण (प्रतिनिधी) - रुजारिओ हे प्रख्यात मालवणी कवी 'माँ मेरी' या पहिल्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून राष्ट्रभाषा हिंदीच्या प्रांगणात मुलुखगिरी करण्यात सज्ज होत आहेत. मराठी राज्यभाषा, मालवणी बोलीभाषा, कोकणी राज्यभाषा आणि आता हिंदी राष्ट्रभाषा अशा चौफेर साहित्यप्रांतात स्वतःला सिद्ध करू पाहणारे बाबला उर्फ रूजारिओ पिंटो हे एकमेवाद्वितीय साहित्यिक व्यक्तिमत्व म्हटले तर वावगे ठरणार नाही. आई 'मेरी' वरच्या अफाट श्रद्धेतून त्यांनी आपल्या पहिल्या हिंदी काव्यसंग - हाचे नामकरणही 'माँ मेरी' असे करुन आपल्या आईला जणू मानवंदनाच दिली आहे, असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ साहित्यिक आणि साने गुरूजी कथामालाचे सर्वेसर्वा सुरेश ठाकुर यांनी काढले. मालवण मधील कवी रुजारिओ पिटो यांच्या 'माँ मेरी' या पहिल्या हिंदी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. या सोहळ्याला व्यासपिठावर कवी रूजारिओ पिंटो यांच्यासह ज्येष्ठ लेखक रवींद्र वराडकर, प्रकाशक प्रमोद कोनकर, नितीन वाळके आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला जिल्हयाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्य रसिकांच्या उपस्थितीत रवींद्र वराडकर यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी पिंटो यांचा परिवार आणि खासकरून आई मेरी पिन्टो, डॉ. सुभाष दिघे, डॉ. शिल्पा झाट्ये, व पाटकर, विजय चौकेकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, अजय मुणगेकर, नामानंद मोडक, सिडने रॉड्रीक्स, विलास खानोलकर, बाळू काजरेकर, रवी तळाशिलकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी साहित्यिक रवींद्र वराडकर म्हणाले, विद्यार्थी दशेपासूनच बाबला पिंटो हे खेळ आणि वाचन या क्षेत्रात सातत्याने अग्रेसर होते. त्याच्या आईने अत्यंत कष्टाने उभारलेल्या व्यवसायाचे त्यांनी सोने करुन प्रचंड विस्तारही केला. हा विस्तार करत असतानाच साहित्याच्या क्षेत्रामध्ये कविता, कथा, वात्रटिका, विडंबन अशा विविध माध्यमातून त्यांनी सामाजमनाच्या दुखऱ्या नसेवर अचूक बोट ठेवत प्रबोधनाचे काम सतत चालू ठेवले. लक्ष्मी आणि सरस्वती एके ठिकाणी नादंत नाही, असे म्हटले जाते. परंतु पिंटो यांनी उद्योगविश्वात अफाट यश मिळवित असताना साहित्याच्या क्षेत्रात तितक्याच समर्थपणे लेखन करीत, नावलौकिक कमावत हा समज खोटा पाडला आहे. 'जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी' या समर्थांच्या उक्तीनुसार आयुष्यभर चोख व्यवहार करत असतानाच आईने दिलेल्या संस्काराची शिदोरी पुढे नेत कित्येक कुटुंबांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करत आहेत. त्याचे हे मोठेपण साहित्यक्षेत्रात मुलुखगिरी करीत असतानासुद्धा दिसत असते. म्हणूनच, काव्यसंग्रहाच्या या प्रकाशनाला जिल्हाभरातून रसिकांची भरगच्च उपस्थिती आहे. माझा विद्यार्थी म्हणून त्याचा जेवढा अभिमान मला वाटतो, त्याहून काकणभर अधिक अभिमान त्यांचे शिक्षक म्हणून घेण्यास मला वाटत आहे, असेही रवींद्र वराडकर म्हणाले.

टाईम्स स्पेशल

प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने साहित्यप्रेमींच्या उदंड प्रतिसादाबद्दल ऋण व्यक्त करत कवी रूजारिओ पिंटो म्हणाले, वयाच्या अवघ्या सहाव्या महिन्यात पितृछत्र हरपल्यानंतर आईने अत्यंत कष्टपूर्वक जीवन जगतानाही दिलेले संस्कार, रूजवलेली जीवनमुल्ये याच्याच आधारे आजवरची वाटचाल करीत आलो आणि म्हणूनच जो काही उद्योजक बाबला पिंटो, कवी बाबली पिंटो म्हणून जे यश दिसत आहे, हे सर्व माझ्या मातेच्या चरणी समर्पित आहे, असे भावोद्‌गार काढले. माझ्या आईचे नाव 'मेरी' आणि म्हणूनच माझ्या पहिल्या हिंदी काव्यसंग्रहाचे नाव 'माँ मेरी' असे ठेवून हा काव्यसंग्रह तिच्या या संस्काराला समर्पित करीत आहे, असेही प्रतिपादन पिंटो यांनी केले. यावेळी पिटो यांनी आपल्या काव्यसंग्रहातील 'मेरी माँ' या हिंदी कवितेचे सादरीकरणही यावेळी केले. काव्यसंग्रहातील कवितांचे सादरीकरण रश्मी आंगणे, मधुरा माणगावकर, गुरूनाथ ताम्हणकर, रामचंद्र कुबल, अनघा कदम, पिन्टो यांनी केले. कोमसापच्या सूत्रसंचालन ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg