loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीतील १४३ वर्षांचा ऐतिहासिक वारसा इतिहासजमा; ४ कोटी मंजूर होऊनही जिल्हा कारागृहाच्या नवीन संरक्षक भिंतीचे काम रखडले

​सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी शहरातील ब्रिटीशकालीन व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जिल्हा कारागृहाची (वर्ग-२) १४३ वर्षे जुनी संरक्षक भिंत अखेर प्रशासनाकडून पाडण्यात आल्याने सावंतवाडीचा एक ऐतिहासिक ठेवा कायमचा इतिहास जमा होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अयोग्य कामामुळे ही भिंत कोसळल्याचा आरोप होत असतानाच, दुरुस्तीसाठी चार कोटी रुपये मंजूर होऊनही नवीन काम सुरू न झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सन १८८२ मध्ये बांधण्यात आलेल्या या ब्रिटिशकालीन कारागृहाच्या दगडी भिंतीवर दोन ते अडीच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने अडीच फुटांचे चिऱ्यांचे वाढीव बांधकाम केले होते. जुन्या व नाजूक रचनेवर अतिरिक्त भार टाकण्यास स्थानिक नागरिकांनी त्यावेळी तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, ज्याचा परिणाम म्हणून गतवर्षी या संरक्षक भिंतीचा मोठा भाग कोसळला. भिंत कोसळल्यानंतर उर्वरित भागाचा धोका वाढल्याने संपूर्ण भिंत पाडण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भिंत कोसळल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांनी या वास्तूची पाहणी केली होती. त्यानंतर तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार, जुनी जीर्ण भिंत पाडून त्या जागी ३२८ मीटर लांबीची व ८.३ मीटर उंचीची नवीन आरसीसी (RCC) संरक्षक भिंत उभारण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, वर्षभर जुनी पडकी भिंत तशीच ठेवल्यामुळे लगतच्या भिंतीलाही भेगा जाऊन ती ढासळत आहे. निधी मंजूर असूनही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या मते, दगडी भिंतीवर अयोग्य पद्धतीने केलेल्या अतिरिक्त बांधकामामुळेच ही ऐतिहासिक वास्तू नष्ट झाली. या चुकीच्या कामाला जबाबदार असणाऱ्यांवर प्रशासनाने कोणती कारवाई केली, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तर उप-कार्यकारी अभियंत्यांनी भिंत जीर्ण आणि पाया कमकुवत असल्याने ती पाडून नवीन उभारली जात असल्याचे सांगत मूळ मुद्द्याला बगल दिली.

टाईम्स स्पेशल

सिंधुदुर्गनगरी येथे नवीन जिल्हा कारागृह उभारल्यानंतर सावंतवाडीतील या जुन्या इमारतीत 'जेल टुरिझम' (कारागृह पर्यटन) सुरू करण्याची संकल्पना माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी मांडली होती. मात्र, आता वास्तूचा मुख्य ऐतिहासिक वारसाच जमीनदोस्त झाल्याने या पर्यटनाचे काय होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबतही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनभिज्ञता दर्शवली आहे. सावंतवाडीतील एक-एक ऐतिहासिक वास्तू प्रशासकीय दुर्लक्षामुळे नष्ट होत असल्याबद्दल इतिहासप्रेमी आणि स्थानिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, प्रशासनाने उर्वरित ऐतिहासिक साक्ष जपण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg