loader
Breaking News
Breaking News
Foto

कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 29 ऑगस्ट रोजी

रत्नागिरी : महाराष्ट्रातील मानाची आणि चार दशकांची समृद्ध परंपरा लाभलेली कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यंदा शनिवार, दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्हास्तरीय माध्यमिक गट, जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गट आणि राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गट अशा तीन गटांचा समावेश असून, 25 ऑगस्टपर्यंत स्पर्धकांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी दिली. दरवर्षी आयोजित केली जाणारी ही स्पर्धा महाराष्ट्रातील वक्तृत्व क्षेत्रातील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. ज्वलंत व समकालीन विषय, निर्भीड मांडणी, पारदर्शक निकाल आणि उत्कृष्ट आयोजन यांमुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांचा या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभत आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा राजापूरच्या नगराध्यक्षा हुस्नबानू खलिपे यांच्या हस्ते होणार असून, सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभाला मंदार फणसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. माध्यमिक गटासाठी ‘सत्याचे प्रयोग आणि मी’, ‘माझे मोबाईल वेड’, ‘बाबासाहेब आणि चवदार तळे’, ‘लोकशाहीत स्वातंत्र्याच्या माझ्या अपेक्षा’ आणि ‘संशोधनरत्न’ रघुनाथ माशेलकर हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी ‘भेसळ’ विरोधी तुकाराम, ‘महाउद्योगपतींच्या जाळ्यात कोकण’, ‘स्त्रीउद्धारक – महात्मा फुले’, ‘दाभोळ खाडी आणि पिफास प्रदूषण आंदोलन’ तसेच ‘अंधश्रद्धेच्या विळख्यात महाराष्ट्र’ हे विषय देण्यात आले आहेत. वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी ‘लोकशाहीचे चार स्तंभ अस्थिर!’, ‘पेपर लीक आणि कॉक्रोजचे तूफान’, ‘भाकरीचा चंद्र शोधणारा कवी – नारायण सुर्वे’, ‘होर्मुझ आणि 'तेल' कारण’तसेच ‘विचारांचा जागर – प्राचार्य शिवाजीराव भोसले’ हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.

टाईम्स स्पेशल

स्पर्धेतील माध्यमिक गटाच्या विजेत्यास स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रासह ₹1,500, प्रथम उपविजेत्यास ₹1,000 आणि द्वितीय उपविजेत्यास ₹750 पारितोषिक देण्यात येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी अनुक्रमे ₹2,000, ₹1,500 आणि ₹1,000, तर वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी ₹8,000, ₹5,000 आणि ₹3,000 अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय कनिष्ठ व वरिष्ठ गटांसाठी सांघिक फिरता चषकही प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका ऑनलाइन स्वीकारण्यात आल्या असून, स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वक्तृत्वकलेचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन स्पर्धा संयोजक प्रा. सचिन टेकाळे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg