loader
Breaking News
Breaking News
Foto

‘सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा’ अभियानातून पाचल येथे सायबर जागृतीचा संदेश

पाचल, राजापूर: पाचल, राजापूर येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरीच्या सायबर योद्धा क्लब आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा’ या अभियानांतर्गत सायबर जागृतीपर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमांचा सुरक्षित, सजग आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी आवश्यक माहिती देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या सत्रात विद्यार्थ्यांना ओटीपीद्वारे होणारी फसवणूक, छायाचित्रांची छेडछाड, सुरक्षित संकेतशब्द, हॅकरद्वारे होणारे सायबर गुन्हे तसेच विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, संकेतशब्द किंवा इतर गोपनीय माहिती देऊ नये, संशयास्पद संदेश व दुव्यांपासून सावध राहावे आणि आर्थिक व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्यावी, यावर भर देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सायबर गुन्ह्यांचे स्वरूप विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजावे यासाठी वास्तविक जीवनातील सायबर गुन्ह्यांच्या घटनांचा अभ्यास उदाहरणांसह मांडण्यात आला. फसवणूक करणारे विविध मार्गांचा वापर करून नागरिकांना कशाप्रकारे लक्ष्य करतात आणि अशा परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. या सत्रासाठी सायबर योद्धा सृष्टी पाटील, श्रवण बोथले, हर्षदा करलेकर आणि आयुष घाडी यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर धोक्यांची माहिती सोप्या भाषेत दिली तसेच सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.

टाईम्स स्पेशल

विद्यालयाच्या प्राचार्या आशा गुरखे यांच्या उपस्थितीत आयोजित या उपक्रमाला एक हजाराहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सत्रात सहभागी होत सायबर सुरक्षेविषयी माहिती जाणून घेतली. या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी सतर्कता, गोपनीय माहितीचे संरक्षण आणि जबाबदार डिजिटल वर्तन यांचे महत्त्व समजले. विशेषतः ओटीपी व संकेतशब्द सुरक्षित ठेवणे, अनोळखी संदेशांवर विश्वास न ठेवणे, संशयास्पद दुवे न उघडणे आणि कोणतीही संशयास्पद ऑनलाइन कृती आढळल्यास योग्य ती खबरदारी घेणे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली. डिजिटल युगात प्रत्येकाने सजग आणि जबाबदार राहणे हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी असून, अशा जनजागृती उपक्रमांतून सुरक्षित, सजग आणि सायबर-साक्षर भारत घडविण्यास निश्चितच हातभार लागेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg