loader
Breaking News
Breaking News
Foto

करुळ येथे महिला बचत गटांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर

वैभववाडी (प्रतिनिधी) : स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. शासकीय योजनांचा आधार घेत लघुउद्योग तसेच बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय उभे केले पाहिजेत. व्यवसाय करणाऱ्या बचत गटांच्या पाठीशी सर्वतोपरी ताकद उभी केली जाईल, अशी ग्वाही वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी दिली. ग्रामपंचायत करुळ येथे उपसभापती साची कोलते यांच्या संकल्पनेतून करुळ येथे महिला बचत गटांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या उपसभापती प्राची कोलते, जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रावराणे, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, सरपंच नरेंद्र कोलते, ग्रामपंचायत सदस्य सचिन कोलते, रेखा सरफरे, माधवी राऊत, दिपाली जामदार, उमेदचे प्रतिनिधी सुशांत कदम, गौरी आहीर, मार्केटिंग प्रतिनिधी कासले तसेच ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सभापती सिद्धेशराव म्हणाले, बचत गटातील महिलांनी केवळ लोणचे-पापड निर्मितीपुरते मर्यादित न राहता विविध व्यवसाय उभे केले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक कर्जपुरवठा आणि इतर सर्व प्रकारचे सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल. वैभववाडी परिसरात मोठ्या संख्येने पर्यटकांची ये-जा असते. या पर्यटनाचा फायदा स्थानिक महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून घेतला पाहिजे. लगतच्या कोल्हापूर जिल्ह्याने दूध व्यवसाय आणि ऊस उत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधली आहे. आपणही त्यांचा आदर्श घेऊन व्यवसायाच्या क्षेत्रात उतरले पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत वैभववाडीमध्ये महिला बचत गटांची संख्या वाढली पाहिजे. यापुढे केवळ बैठका आणि शिबिरांपुरते मर्यादित न राहता लोकप्रतिनिधी आणि बचत गटातील महिलांमध्ये सातत्याने संवाद झाला पाहिजे. केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता महिलांनी स्वतःचे व्यवसाय उभे करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. उपसभापती साची कोलते म्हणाल्या, महिलांनी व्यवसायासाठी घराबाहेर पडले पाहिजे. लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी असताना महिलांनी मागे राहू नये. कुक्कुटपालन, शेळीपालन तसेच अन्य व्यवसायांसाठी आवश्यक प्रशिक्षण महिलांना त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रावराणे म्हणाल्या, जिल्ह्यात वैभववाडीतील बचत गटांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली पाहिजे. गावातील प्रत्येक महिलेने बचत गटात सहभागी झाले पाहिजे. बचत गट केवळ कागदावर नको. जिल्ह्याच्या कृषी अथवा अन्य प्रदर्शन मध्ये बचत गटांनी उतरले पाहिजे. तसेच महिलांनी विविध व्यवसायांच्या माध्यमातून स्पर्धेत टिकून राहिले पाहिजे. यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, सुशांत कदम, कासले आणि गौरी आहीर यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित महिलांनी व्यवसाय करताना येणाऱ्या विविध अडचणी लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्यांच्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत करुळ तसेच गावातील बचत गटातील महिलांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg