loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीयस्तरावरील परिसंवादासाठी डॉ. ज्योती तोरसकर यांची जेएनयू दिल्ली येथे प्रतिनिधी म्हणून निवड

मालवण (प्रतिनिधी) - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), नवी दिल्ली, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ व ३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे ‘Life and Legacy of Chhatrapati Shivaji Maharaj’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय परिसंवादासाठी मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षिका व इतिहास संशोधक डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांना प्रतिनिधी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक यांनी डॉ. तोरसकर यांना पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे या राष्ट्रीय परिसंवादासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, कार्य, विचार, प्रशासन, राष्ट्रनिर्मितीतील योगदान तसेच समकालीन भारतावरील त्यांचा प्रभाव या विविध पैलूंवर या परिसंवादात देशभरातील विद्वान, संशोधक व अभ्यासक विचारविनिमय करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. तोरसकर यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीशी संबंधित ‘मोरयाचा धोंडा’ या ऐतिहासिक स्थळाचा संशोधनात्मक अभ्यास करून या विषयावर संशोधनपर पेपर तयार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाच्या प्रारंभी मोरयाचा धोंडा येथे केलेले गणेशपूजन व सागरपूजन, त्यामागील ऐतिहासिक संदर्भ, स्थानिक पुरावे, धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आणि या स्थळाचे महत्त्व यांचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. आजवर मोरयाच्या धोंड्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महती प्रामुख्याने महाराष्ट्रापुरतीच परिचित होती. मात्र, आता या स्थळाशी संबंधित संशोधनाची नोंद राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे किल्ले प्रेरणोत्सव समितीने केलेल्या प्रयत्नांना आणि डॉ. तोरसकर यांच्या सागरी किल्ल्यांच्या इतिहासावरील पीएचडी संशोधनाला मिळालेली ही महत्त्वपूर्ण फलश्रुती मानली जात आहे.

टाईम्स स्पेशल

सिंधुदुर्ग किल्ला आणि मोरयाचा धोंडा यांचा इतिहास, स्थानिक श्रद्धा, सागरी परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दूरदृष्टीशी असलेला संबंध यांचा अभ्यास हेरिटेज टुरिझमच्या दृष्टीनेही अत्यंत मोलाचा ठरू शकतो. या ऐतिहासिक स्थळाचे संशोधन, संवर्धन आणि योग्य पद्धतीने सादरीकरण झाल्यास मालवणच्या सांस्कृतिक पर्यटनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाच इतिहास संशोधनाची वाटचाल करणाऱ्या डॉ. तोरसकर यांच्या या सहभागामुळे मालवण, सिंधुदुर्ग किल्ला आणि मोरयाचा धोंडा यांचा इतिहास देशाच्या राजधानीतील प्रतिष्ठित शैक्षणिक व्यासपीठावर पोहोचणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक व इतिहासप्रेमी क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg