loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड प्रशासनासमोर शहरातील पार्किंग व्यवस्थेसह रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे मोठे आव्हान

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड शहरातील मुख्य रस्त्यासह विविध प्रमुख मार्गावरील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि शहरात नसलेली वाहने पार्किंग करण्याची सुविधा या समस्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासमोर मोठ्या डोकेदुखी ठरणार आहेत. मंडणगड शहरातील वाढती वर्दळ लक्षात घेऊन शहरात वाहने पार्किंग करण्याची व्यवस्था तसेच रस्त्यातील खड्डे बुजवून टाकण्याचे काम आधीच करणे आवश्यक आहे. हे प्रशासनासमोर उभे ठाकलेले मोठे आव्हान आहे, याची व्यवस्था प्रशासनाकडून कशी काय केली जातेय यावरच गणेशोत्सव काळात वाढलेली गर्दी आणि लोकांना वाहनांच्या वर्दळीचा होणारा त्रास स्थानिक नगर पंचायत प्रशासन कोणकोणत्या उपाययोजना करुन शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविते यावरच प्रशासनाचे खरे यशापयश अवलंबून आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड शहर हे मंडणगड तालुक्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. याच मंडणगड शहराला अगदी लागुनच असलेल्या भिंगळोली गावाच्या हद्दीत तालूका प्रशासनाच्या आस्थापनातील तहसीलदार कार्यालय, पोलिस ठाणे, ग्रामीण आरोग्य रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना आदी विविध आस्थापनांची कार्यालये आहेत. तर पंचायत समिती कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, विद्युत महावितरण आदी अनेक शासकीय आस्थापनांची कार्यालये मंडणगड शहरातच आहेत. अशा कार्यालयात विविध शासकीय कामासाठी चाकरमानी जेव्हा गावी येतात तेव्हा मोठ्या संख्येने गावागावातील पदाधिकारी आपल्या कामांचे काय झाले याची विचारणा करण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारची दुकाने ज्यात किरकोळ माल, कापड, खाऊ, मिठाई, फळ, फुले, भाजी आदी खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक मंडणगड येथील बाजारपेठेतच येत असतात.

टाईम्स स्पेशल

अशा या मंडणगड शहरातूनच एक मार्ग बाणकोट वेळासकडे जातो तर दुसरा मार्ग भिंगळोलीतुन धुत्रोलीमार्गे महाडकडे जातो तर तिसरा मार्ग हा पाट मार्गे म्हाप्रलकडे जातो तर चौथा मार्ग हा कोंझर अडखळ गावाकडे जातो. त्यामुळे गणेशोत्सव काळात एकतर मुंबई पुणे ठाणे आदी मोठ्या शहरांकडून येणारे चाकरमानी खाजगी वाहने घेऊन आपला प्रवास करत असतात त्यातच एसटी महामंडळाच्या बसेस, खाजगी बसेस तसेच अवजड वाहने, तीन चाकी, दुचाकी वाहने मोठ्या संख्येने या रस्त्यावरून ये-जा करत असतात. ग्रामिण भागातुन सामान खरेदी करण्यासाठी येणार्‍यांची आधीच गर्दी असते त्यामुळे त्यांनी आणलेल्या वाहनांना पार्क करण्यासाठी येथे वाहनतळच नसल्याने मोठी अडचण होणार आहे. त्यात खड्ड्यांमुळे आणखीनच समस्या उग्र बनणार आहे. मुख्य मार्गावरील वाहतुक सुरळीत सुरू राहण्यासाठी तात्पुरती का होईना वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था तसेच रस्त्यातील खड्डे बुजवून मार्ग वाहतूक योग्य करून नगरपंचायत प्रशासनाने स्थानिक रहिवाशांसह तालुक्यातील प्रवाशांची तसेच पर्यटकांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधीच उपाययोजना करुन वाहतूक सुरळीत होण्यास मदत केली पाहिजे. अशा या ऐन गणेशोत्सवात समोर उभ्या ठाकलेल्या मोठ्या समस्यांची नगर पंचायत प्रशासन उपाययोजना कशाप्रकारे करुन गर्दीवर नियंत्रण मिळवते हे आता नजिकच येवून ठेपलेल्या गणेशोत्सव काळात समजणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg