loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्याच्या पर्यटन, उद्योग आणि हवाई वाहतूक क्षेत्राला नवी झेप

रत्नागिरी: जिल्ह्याच्या पर्यटन, उद्योग आणि हवाई वाहतूक क्षेत्राला नवी झेप मिळवून देणारी आनंदाची बातमी समोर येत आहे. जयगड येथे महिंद्रा समूहाचे अत्याधुनिक आणि जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित हॉटेल अंतिम टप्प्यात आले असून, या प्रकल्पाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरीपासून अवघ्या पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत उभारले जाणारे हे हॉटेल जिल्ह्याच्या पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणातील पर्यटनाचा चेहरामोहरा बदलण्यास मोठी मदत होणार आहे. ​केवळ पर्यटनावरच नव्हे, तर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासावरही प्रशासनाचा विशेष भर आहे. रत्नागिरी शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आणि विमानतळ तसेच समुद्रकिनाऱ्याच्या जवळ एमआयडीसीमार्फत सुमारे साडेतीन हजार एकर जमीन उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजापूर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांत विकसित होणाऱ्या या औद्योगिक भूमीमुळे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, ही जमीन संपादित करताना शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य आणि समाधानकारक मोबदला मिळवून देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे, ज्यामुळे स्थानिक स्तरावरही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. ​हवाई कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनेही रत्नागिरीकरांसाठी एक मोठी पर्वणी लवकरच उपलब्ध होत आहे. रत्नागिरी विमानतळाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, आगामी जानेवारी २०२७ च्या पहिल्या आठवड्यात मुंबईसाठी ७८ आसनी एटीआर विमानसेवा सुरू करण्याचा प्रशासनाचा ठाम निर्धार आहे. चिपी आणि शिर्डी विमानतळांच्या धर्तीवर सुरू होणारी ही हवाई सेवा कोकण आणि मुंबईमधील अंतर कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

टाईम्स स्पेशल

मोठ्या उद्योगांसोबतच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीसाठी 'होम-स्टे' (न्याहारी-निवास) संकल्पनेवरही भर दिला जात आहे. सध्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सुमारे साडेआठशे होम-स्टे प्रकल्प यशस्वीपणे सुरू असून पर्यटन हंगामात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. स्थानिक नागरिकांनी, महिलांनी आणि तरुणांनी प्रत्येक पर्यटनस्थळी अशा प्रकारच्या छोट्या निवास व्यवस्था उभारल्यास हॉटेलिंग क्षेत्रात एक नवी क्रांती घडू शकते. जयगडचे पंचतारांकित हॉटेल, मुंबईची विमानसेवा, एमआयडीसीसाठी उपलब्ध झालेली अथांग जमीन आणि स्थानिक स्तरावरील होम-स्टे यामुळे रत्नागिरीचा सर्वांगीण विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शासन, उद्योजक आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य अतिशय मोलाचे ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg