loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडीतील नारायण सुर्वे स्मृती संमेलनाला साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडी (प्रतिनिधी) - कविवर्य नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला दिवाणखान्यातून बाहेर काढले. तिला गिरणगावातील चाळींमध्ये आणले, कारखान्यांच्या धुराड्यांच्या छायेत उभे केले आणि कष्टकर्‍यांच्या, कामगारांच्या, पददलितांच्या झोपड्यांमध्ये नेऊन तिची वीण घट्ट केली. या सगळ्या प्रक्रियेतून कविता लिहिताना कवी नारायण सुर्वे यांनी व्यवस्थेलाच प्रश्न विचारला. म्हणूनच त्यांची कविता सर्वकालीन झाली, असे प्रतिपादन कवयित्री प्रमिता तांबे यांनी येथे केले. अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचतर्फे वैभववाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन सभागृहात वैभववाडी-हेतचे सुपुत्र कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी स्मृती प्रित्यर्थ कवयित्री प्रमिता तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ’श्रावणसरी’ या साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना तांबे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कविवर्य नारायण सुर्वे या दोन युगपुरुषांच्या विचारांच्या छायेखाली हे संमेलन होत आहे, ही बाब या कार्यक्रमाचे औचित्य अधिक गडद करते असेही आग्रहाने सांगितले. प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी नारायण सुर्वे यांची कविता वाचून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला मंचचे अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, प्रेमानंद रावराणे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कवयित्री तांबे म्हणाल्या, सुर्वे यांचे वैभववाडीशी असलेले नाते हे केवळ भौगोलिक नाही, तर ते आत्मिक आहे. वैभववाडी-हेत हे त्यांचे मूळ गाव. कोकणातील माती जशी वरून कठीण आणि आतून पाझरणारी असते, तसाच सुर्वे यांच्या कवितेचा बाज आहे. वरून वास्तववादी, आक्रमक, अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारा; पण आतून माणसाविषयीची अथांग करुणा भरलेली! त्यांच्या ’माझे विद्यापीठ’, ’जाहीरनामा’, ’सनद’ आणि ’ऐसे गा मी ब्रह्म’ या काव्यसंग्रहांनी कष्टकर्‍याला, शोषित-वंचिताला स्वाभिमान मिळवून दिला. प्राचार्य चव्हाण म्हणाले, कविता बोलते तीच कवीची भाषा असते. कवीचा अनुभव कवितेत बोलत असतो. कवितेसाठी प्रचंड वाचन आणि निरीक्षण शक्ती महत्त्वाचे असते. कवीकडे प्रचंड निरीक्षण शक्ती असते म्हणूनच तो चांगली कविता लिहू शकतो. समाजातले दुःख कवी मांडत असतो, म्हणून तो दुःखाचाही भाष्यकार असतो. आपल्या आयुष्यात मातृभाषा फार महत्त्वाची असते. मातृभाषेची संस्कृती जोपासली गेली पाहिजे आणि हेच काम कवी करत असतो. दक्षिणेकडील राज्यांनी साहित्यिकांचा आदर जपला आणि आपली भाषाही जोपासली. भाषेमुळेच कलावंताचे व्यक्तिमत्त्व घडते, हे नव्या कवींनी लक्षात ठेवावे. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर म्हणाले, कौतुक करावा असा हा साहित्यिक कार्यक्रम आहे. कवितेमुळे सांस्कृतिक वातावरण उत्तम राहते. आणि हे चांगले सांस्कृतिक वातावरण वैभववाडीत निर्माण होण्यासाठी अक्षरवैभवसारखी संस्था कार्यरत आहे, याबद्दल तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. संत बहिणाबाईंच्या कविता वाचून प्रेरणा मिळते, त्याचप्रमाणे या कार्यक्रमातूनही नव्या कवींना प्रेरणा मिळेल, असा विश्वास वाटतो. कवितेसाठी मार्गदर्शन आवश्यक असते आणि ते मार्गदर्शनही या कार्यक्रमातून मिळेल.

टाईम्स स्पेशल

यावेळी प्रेमानंद रावराणे यांनीही आपले विचार व्यक्त केले. उद्घघाटन सत्रानंतर नव्या-जुन्या कवींचे कवीसंमेलन अतिशय रंगतदार झाले. यामध्ये सीमा म्हस्के, जयवंत मोरे, मधुकर मातोंडकर, हरिश्चंद्र भिसे, प्रेमानंद रावराणे, सचिन तळेकर, निशिगंधा गावकर, सत्यवान साटम, अजिंक्य जाधव, जयकुमार पाटील, स्वप्निल पाटील, हनुमंत सुतार, स्नेहल रावराणे, नेहा पवार, पुजा सावंत, समृद्धी जाधव, अक्षरा पांचाळ, प्राची पांचाळ, योगेश सकपाळ, सचिन भास्कर, धैर्य बोडेकर, शुभ्रा सावंत आदी कवींनी आपल्या उत्तम कविता सादर केल्या.संजीवनी पाटील, अनुजा परब, विद्या पाटील, मारूती कांबळे, संपदा जाधव आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. एस. एन. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन चेतन बोडेकर, प्रफुल्ल जाधव व संदेश तुळसणकर यांनी केले, तर आभार नंदिता पवार-रावराणे यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg