loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि निर्विघ्न होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त तैनात

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी आणि गावी जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून धावणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि निर्विघ्न व्हावा यासाठी रत्नागिरी पोलीस प्रशासनाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) अत्यंत चोख आणि नेटका बंदोबस्त तैनात केला आहे. महामार्गावर कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये आणि प्रवाशांना तातडीने मदत मिळावी यासाठी पोलीस अधिकाऱ्यांपासून ते अंमलदारांपर्यंत अख्खी यंत्रणा अहोरात्र रस्त्यावर उतरली आहे. रत्नागिरी विभागातील चिपळूण आणि हातखंबा या दोन मुख्य पोलीस केंद्र हद्दींमध्ये या बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण महामार्ग बंदोबस्तासाठी दोन्ही केंद्रांत मिळून एकूण १०९ पोलीस अंमलदार आणि ५ वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रत्यक्ष तैनात करण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये चिपळूण केंद्रांतर्गत पोलीस निरीक्षक दिपाली जाधव आणि पोउपनि इर्शाद बेग यांच्या नेतृत्वाखाली ३ अधिकारी व ५३ अंमलदारांची टीम कार्यरत आहे. या ताफ्यात १७ स्थानिक अंमलदारांसह बाहेरून मागवलेल्या ३५ अतिरिक्त अंमलदारांचा समावेश आहे. दुसरीकडे, हातखंबा केंद्रांतर्गत सपोनि सत्यराज घुले यांच्या नेतृत्वाखाली २ अधिकारी आणि ५६ अंमलदार महामार्गावर पहारा देत आहेत, ज्यामध्ये २५ स्थानिक व ३१ बाहेरून मागवलेले अंमलदार आहेत. या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या निवासासाठी लांजा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये १६ आणि पाली येथील आदर्श मंगल कार्यालयात १५ कर्मचाऱ्यांची सोय करण्यात आली आहे. वाहतुकीचा वेग मंदावणाऱ्या निवळी, बहादूरशेखनाका, पाली आणि लांजा या चार मुख्य 'बॉटलनेक' पॉईंट्सवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. याशिवाय फरशीतिठा, संगमेश्वर एस.टी. स्टँड, सावर्डा बाजारपेठ, ओणी, अनुस्कुरा आणि आवाशी टोलनाका अशा ठिकाणी २४ तास दिवस-रात्र पाळीत फिक्स पॉईंट बंदोबस्त लावला आहे. महामार्गावर अचानक एखादे वाहन बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास रस्ता त्वरित मोकळा करण्यासाठी चिपळूण व हातखंबा येथे क्रेन तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

मोरवंडे ते चिपळूण, चिपळूण ते आरवली, आंबेतखोल ते संगमेश्वर, संगमेश्वर ते बावनदी आणि पाली ते लांजा या सर्व टप्प्यांवर २४ तास जीप आणि मोटर सायकल पेट्रोलिंग सुरू राहणार असून गाडी खराब झाल्यास मदतीसाठी स्थानिक मेकॅनिकची यंत्रणाही जोडण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत चिपणी मार्ग कळंबस्ते आणि मुरशी साखरपा चेकपोस्ट यांसारखे डायव्हर्शन मार्ग सज्ज ठेवले आहेत. जड वाहनांसाठी लोटे एक्सल फाटा, कामथे, खेर्डी एमआयडीसी आणि झरेवाडी ढाबा येथे पार्किंग बंदोबस्त लावला आहे. पोलीस प्रशासन चाकरमान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg