loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल ४,८१४ प्रकरणांमध्ये सामोपचाराने तोडगा

​रत्नागिरी (जमीर खलफे) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (सर्वोच्च न्यायालय, दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (उच्च न्यायालय, मुंबई) यांच्या प्राप्त निर्देशानुसार जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये या वर्षातील तिसऱ्या ‘राष्ट्रीय लोकअदालत’ उपक्रमाचे अतिशय यशस्वी आयोजन करण्यात आले. या संपूर्ण लोकअदालतीच्या माध्यमातून विविध न्यायालयांतील प्रलंबित आणि वाद दाखलपूर्व अशा तब्बल ४ हजार ८१४ प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांच्या सहमतीने सामोपचाराने तोडगा काढण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​ही भव्य राष्ट्रीय लोकअदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी सांगितले की, या लोकअदालतसाठी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तब्बल १९ हजार ५२३ प्रकरणे आणि वाद दाखलपूर्व (Pre-litigation) १५ हजार ४४४ प्रकरणे तडजोडीच्या टप्प्यावर ठेवण्यात आली होती. ​लोकअदालतीच्या या प्रक्रियेमध्ये पक्षकार आणि वकील वर्ग या सर्वांचाच अत्यंत उत्स्फूर्त आणि सकारात्मक सहभाग पाहायला मिळाला. दिवसभरात झालेल्या तडजोडीच्या प्रक्रियेअंती प्रलंबित प्रकरणांपैकी १७१ प्रकरणांमध्ये यशस्वी तोडगा निघाला. तर वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये नागरिकांनी मोठा प्रतिसाद दाखवत तब्बल ४ हजार ६४३ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा केला. अशाप्रकारे एकूण ४ हजार ८१४ प्रकरणांचा दोन्ही बाजूंच्या संमतीने कायमचा मार्ग निघाला आहे.

टाईम्स स्पेशल

या लोकअदालतीमध्ये प्रामुख्याने प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेश अनादर (चेक बाऊन्स) संबंधी प्रकरणे, नाजूक स्वरूपाचे वैवाहिक व कौटुंबिक वाद, बँक व पतसंस्थांचे वसुली वाद, तसेच थकीत वीज व टेलिफोन बिलांशी संबंधित विविध प्रकरणांवर सखोल चर्चा करून तडजोड घडवून आणण्यात आली. यामुळे पक्षकारांचा वेळ आणि पैशांची मोठी बचत झाली असून, दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन वादांवर कायमचा पडदा पडला आहे. ​रत्नागिरी जिल्ह्यातील ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समित्यांचे सर्व न्यायाधीश, विधीज्ञ आणि न्यायालयीन कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन परिश्रम घेतले. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करून नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळवून देण्यासाठी ही लोकअदालत अत्यंत फलदायी ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg