loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी टर्मिनस कडे केंद्राचे दुर्लक्ष, गोवा कर्नाटकातील प्रकल्पांना मंजुरी, प्रवासी संघटना जनआंदोलन उभारणार

सावंतवाडी:कोकण रेल्वेच्या तिसऱ्या आर्थिक पुनर्रचना पॅकेजला ‘पीएम गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या (NPG) १०४ व्या बैठकीत तत्त्वतः मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पॅकेजमध्ये गोवा आणि कर्नाटकातील पायाभूत सुविधांसाठी विविध प्रकल्पांचा समावेश करण्यात आला असताना, महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रकल्पाचा समावेश नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीने नाराजी व्यक्त करत टर्मिनसचा पुनर्रचना पॅकेजमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे.कोकण रेल्वे मार्गावरील सुरक्षितता आणि वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी प्रस्तावित आर्थिक पुनर्रचना योजनेत गोव्यातील पेडणे आणि जुने गोवे येथील विद्यमान बोगद्यांना समांतर नवीन जुळ्या बोगद्यांच्या बांधकामाचा प्रस्ताव आहे. यासाठी दीड हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच गोव्यातील मायें, न्यूरा-ओ-ग्रांदे आणि कर्नाटकातील मुकांबिका रोड-बायंदूर परिसरात नवीन क्रॉसिंग स्थानकांच्या उभारणीचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.मात्र, महाराष्ट्रातील सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा या आराखड्यात समावेश नसल्याचा आक्षेप प्रवासी संघटनेने घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२७ जून २०१५ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झाले होते. मात्र, दशक उलटून गेल्यानंतरही प्रकल्पाला अपेक्षित गती मिळालेली नाही. निधीअभावी टर्मिनसचा दर्जावाढ प्रकल्प रखडल्याचा दावा संघटनेने केला आहे.कोकण रेल्वे महामंडळात भारतीय रेल्वे तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांचा सहभाग आहे. केंद्र सरकारकडे ६६.७९ टक्के हिस्सा असून उर्वरित समभाग राज्यांकडे आहेत. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव राज्यांच्या समभाग परताव्याच्या आणि वित्तीय अटींच्या प्रश्नांमुळे प्रलंबित असल्याचे संघटनेने म्हटले आहे.महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला गुंतवलेले ३९६.५४ कोटी रुपयांचे भागभांडवल परत करण्यासह कोकण रेल्वे हे नाव कायम ठेवण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले आहे. कर्नाटकने भांडवली खर्चातील हिस्सा आणि सन्मानजनक ‘एक्झिट ऑप्शन’चा मुद्दा उपस्थित केला आहे. गोव्याने आपले समभाग बिनशर्त हस्तांतरित केल्याचा दावा करण्यात आला आहे.या प्रशासकीय प्रक्रियेमुळे रोहा ते ठोकूर दरम्यानच्या ७३९ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रश्न कायम असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. आतापर्यंत रोहा–वीर आणि मडगाव–माजोर्डा दरम्यान सुमारे ५५ किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे

टाइम्स स्पेशल

मुंबई, ठाणे आणि पुणे येथून कोकणात येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांना टर्मिनस सुविधा उपलब्ध नसल्याने मडगावपर्यंत धावावे लागते. सावंतवाडी रोड स्थानकावर सध्या गाड्यांचे रिव्हर्सल, स्टॅबलिंग आणि वॉशिंग पिट लाईनसारख्या सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला आहे.सावंतवाडी स्थानकात दोन अतिरिक्त हाय-लेव्हल आयलंड प्लॅटफॉर्म, लूप लाईन्स, क्विक वॉटरिंग सिस्टीम आणि वॉशिंग पिट लाईन उभारल्यास गाड्या सावंतवाडीतच समाप्त करता येतील. त्यामुळे मडगाव यार्डावरील ताण कमी होऊन रेल्वे वाहतुकीचे नियोजन अधिक सुलभ होऊ शकते, असा संघटनेचा दावा आहे.कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाकडे सविस्तर तांत्रिक निवेदन पाठविले आहे. सावंतवाडी टर्मिनसचा तिसऱ्या आर्थिक पुनर्रचना पॅकेजमध्ये समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे.गोव्यातील बोगद्यांसाठी मोठ्या निधीची तरतूद होत असताना, महाराष्ट्रातील सावंतवाडी टर्मिनसकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तळवडेकर यांनी केला. गणेशोत्सव, होळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या व्यवस्थापनासाठी सावंतवाडीत टर्मिनस सुविधा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विलीनीकरणाचा प्रश्न स्वतंत्रपणे सोडवावा; मात्र टर्मिनस आणि दुहेरीकरणाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg