loader
Breaking News
Breaking News
Foto

रस्ता असूनही किंजळे-कळकरायवाडीसह धनगरवाडी 2 किमीच्या रस्त्यावर ग्रामस्थांची पायपीट; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या किंजळे तर्फे नातू ते कळकरायवाडी (प्रजिमा-१६ ते प्रजिमा-८१, मांडवे-कोसमवाडी) हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. मात्र कागदावर असलेला हा रस्ता प्रत्यक्षात मृतवत झाल्याने ग्रामस्थांना गाडी अर्ध्या रस्त्यात लावून २ किमी पायपीट करावी लागत आहे. किंजळे तर्फे नातू फाटा ते कळकरायवाडी हे अंतर सुमारे ६ किलोमीटर आहे. दि. ०५, ०६ व ०७ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. यामुळे रस्ता तब्बल तीन दिवस पूर्णपणे बंद होता. PWD कडून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली असली तरी सध्या या रस्त्यावरून कोणतेही अवजड वाहन, रुग्णवाहिका किंवा बस जाऊ शकत नाही. आणखी एक मोठा पाऊस झाला तर हा रस्ता कायमस्वरूपी बंद होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा संपूर्ण रस्ता घाट परिसरातून जात असल्याने त्याला "घाट रस्ता" म्हणून घोषित करून संरक्षण भिंत आणि गटारांसह दर्जेदार काम करावे, अशी मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. याबाबत स्थानिक आमदार तथा गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दि. २७/०२/२०२६ रोजीच्या पत्रात लेखाशीर्ष ५०५४-०३-०४ अनुक्रमांक १८ वर या रस्त्याचा समावेशही करण्यात आला आहे. मात्र, या वर्षीच्या अर्थसंकल्पात या रस्त्यासाठी कोणताही निधी मंजूर झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे २-३ वर्षांपूर्वी या रस्त्यासाठी मोठा निधी उपलब्ध झाला होता. या कामाचा ठेका शंकर पवार यांच्याकडे होता. मात्र झालेले काम अत्यंत अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. याबाबत वारंवार PWD प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनही संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई झाली नाही.

टाईम्स स्पेशल

"रस्ता असूनही आम्हाला पायी प्रवास करावा लागतो याला जबाबदार कोण? गेल्या दोन-तीन वर्षांपासून निधी मिळाला असता तर आज ही वेळ आली नसती. शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून या रस्त्याला न्याय द्यावा," अशी मागणी किंजळे तर्फे नातू येथील ग्रामस्थ नितीन सखाराम जाधव यांनी केली आहे. दरम्यान, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकताच मुंबई-गोवा महामार्गावर खवटी येथे ३० फूट खोल खड्ड्यात दुचाकी कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न किती गंभीर आहे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून कामास प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg