loader
Breaking News
Breaking News
Foto

प्लास्टिक बंदीसह डिजिटल व्यसनाविरोधात मोहापाड्यात जनजागृती, विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; कापडी पिशव्यांसह संदर्भ ग्रंथांचे वाटप

रसायनी (राकेश खराडे) - पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त समाजनिर्मिती तसेच विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साधनांच्या योग्य व मर्यादित वापराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट आणि पिल्लई महाविद्यालय, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, रसायनी-मोहापाडा यांच्या संयुक्त विद्यमाने मोहापाडा येथे विविध जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. जिल्हा परिषद केंद्र शाळा, मोहापाडा येथे विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, प्लास्टिक बंदीचे महत्त्व तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व शैक्षणिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. डिजिटल साधनांचा योग्य, सुरक्षित आणि मर्यादित वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि पर्यावरण तसेच डिजिटल माध्यमांच्या योग्य वापराबाबत अधिक माहिती मिळावी, या उद्देशाने संदर्भ ग्रंथांचे वाटप करण्यात आले. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यानंतर मोहापाडा बाजारपेठेत प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. दुकानदार, व्यापारी आणि नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नागरिक व दुकानदारांना कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक पिशवी नको, कापडी पिशवी वापरा हा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी मोहापाडा बाजारपेठेतून जनजागृती रॅली काढून पर्यावरण संवर्धन आणि डिजिटल व्यसनाविरोधात घोषणाबाजी केली. प्लास्टिकला नकार, कापडी पिशवीचा स्वीकार! मोबाईलचा योग्य वापर करा, डिजिटल व्यसनापासून दूर राहा! स्वच्छ पर्यावरण, निरोगी समाज आणि जबाबदार डिजिटल वापर हीच काळाची गरज! अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

टाईम्स स्पेशल

पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक मोहापाडा घडविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्रमास पिल्लई महाविद्यालयाचे मार्केटिंग मॅनेजर गणेश शिंदे, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोविंद जाधव, अफसाना खान, शिक्षिका अनिता म्हात्रे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी, जिल्हा परिषद केंद्र शाळा मोहापाडा येथील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि डिजिटल साधनांचा जबाबदार वापर याबाबत जनजागृती करण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg