loader
Breaking News
Breaking News
Foto

मोकाट जनावरे, अंधारे रस्ते आणि पुसलेल्या साईड पट्ट्या; शहराच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेला निवेदन

रत्नागिरी (जमीर खलफे) : शहरातील रस्त्यांवर वाढलेली मोकाट जनावरे, बंद पथदिवे, रस्त्यांच्या दुतर्फा पुसलेल्या साईड पट्ट्या तसेच खड्डेमय अंतर्गत रस्ते या नागरी समस्यांकडे रत्नागिरी नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना १५ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत मार्गांवर मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यभागी ठिय्या मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अचानक समोर येणाऱ्या जनावरांमुळे दुचाकीस्वारांसह पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करून त्यांची योग्य त्या गोशाळा अथवा निवारा केंद्रात रवानगी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या हा देखील शहरातील गंभीर प्रश्न असल्याचे संघटनेने म्हटले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने नियमानुसार निर्बीजीकरणासह आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. हे प्रश्न केवळ सुविधांशी संबंधित नसून नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षिततेशी निगडित असल्याने प्रशासनाने त्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने निवेदनातून मांडली आहे. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजेंद्र कृष्णा कांबळे, महासचिव बिपिन अजित आयरे, सल्लागार अजित लक्ष्मण जाधव, शहराध्यक्ष विनोद कांबळे तसेच सदस्य सुभाष कदम, सुरेश पवार आणि अशोक जाधव उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

रत्नागिरी शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील दुतर्फा साईड पट्ट्यांचे (रोड मार्जिन मार्किंग) रंगकाम पुसले गेले आहे. पावसाळ्यात तसेच रात्रीच्या वेळी रस्त्याची सीमा आणि कच्चा भाग यांचा अंदाज न आल्याने वाहन घसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे प्रमुख रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना ठळक साईड पट्ट्या तातडीने आखण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शहरातील विविध प्रभागांमधील काही पथदिवे बंद असून काही दिवे अत्यंत मंद प्रकाश देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रस्त्यांवर पुरेसा प्रकाश नसल्यामुळे रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे किंवा रस्त्यावरील अडथळे वाहनचालकांच्या लक्षात उशिरा येतात. परिणामी अपघाताचा धोका वाढू शकतो. तसेच अंधाराचा गैरफायदा घेऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने बंद पथदिवे तातडीने दुरुस्त करून पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील खड्डेमय झालेल्या अंतर्गत रस्त्यांचे आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण करून नागरिकांना सुरक्षित आणि सुकर वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg