loader
Breaking News
Breaking News
Foto

72 किलोमीटरचा खडतर प्रवास यशस्वी! प्रसाद देवस्थळी यांनी पूर्ण केली मानाची 'खार्दुंगला चॅलेंज'

रत्नागिरी : कोकणच्या शिमगोत्सवाच्या काळात, विशेषतः धामापूर गावात आई नवसरी देवी तसेच वाघजाई देवीच्या पालख्या वाडी-वाडीत आणि घराघरांत नेल्या जातात. मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थ या पालख्या खांद्यावर घेऊन अनेक दिवस चालत आपल्या प्रथा-परंपरा जपत असतात. याच परंपरेतून मिळालेली प्रेरणा प्रसाद देवस्थळी यांच्या 72 किलोमीटरच्या खार्दुंगला चॅलेंजदरम्यान त्यांच्या सोबत होती. “या संपूर्ण रनदरम्यान प्रत्येक किलोमीटरला आपल्या धामापूर गावातील आई नवसरी देवी आणि वाघजाई देवीच्या पालख्या एका वाडीतून दुसऱ्या वाडीत जात आहेत, त्या पालख्यांबरोबर आपले मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थ चालत आहेत, हे सतत डोळ्यासमोर येत होते. त्यांच्या जिद्दीचा आणि परंपरेप्रती असलेल्या निष्ठेचा विचार मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत होता,” असे प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच प्रेरणेच्या बळावर कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे आयोजक प्रसाद देवस्थळी यांनी अत्यंत खडतर अशी 72 किलोमीटरची खार्दुंगला चॅलेंज यशस्वीपणे पूर्ण केली. ही कामगिरी करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले धावपटू म्हणून त्यांचा गौरव होत आहे. ही संपूर्ण धाव आणि मिळवलेले मेडल कोकणच्या शिमगोत्सवाच्या पारंपरिक पद्धती जपणाऱ्या सर्व मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थांना समर्पित असल्याचे देवस्थळी यांनी सांगितले. अत्यंत प्रतिकूल हवामान, शून्याच्या आसपासचे तापमान, तब्बल 32.5 किलोमीटरचा खडतर चढ आणि त्यानंतरचे आव्हानात्मक डोंगराळ रस्ते अशा परिस्थितीवर मात करत त्यांनी ही कामगिरी केली. खार्दुंग गावातून लेहपर्यंतचे 72 किलोमीटरचे अंतर 14 तासांच्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते. साधारण उणे 1 अंश सेल्सिअस तापमानात या आव्हानाची सुरुवात झाली. खार्दुंगला टॉपच्या दिशेने जाणारा सुरुवातीचा तब्बल 32.5 किलोमीटरचा चढ हा स्पर्धेतील सर्वात कठीण टप्प्यांपैकी एक होता. खार्दुंगला टॉपपर्यंत पोहोचेपर्यंत तापमान शून्याच्या आसपास होते. विविध कठीण निकषांद्वारे पात्र ठरलेल्या सुमारे 325 धावपटूंनी या आव्हानात सहभाग घेतला होता. अत्यंत कठीण परिस्थितीमुळे सहभागींपैकी अनेकांना हे आव्हान पूर्ण करता आले नाही. पहिल्या 32 ते 32.5 किलोमीटरच्या चढावर बहुतांश धावपटूंना धावण्याऐवजी चालतच पुढे जावे लागले.

टाईम्स स्पेशल

“या रनमध्ये शारीरिक क्षमतेपेक्षा इच्छाशक्ती, जिद्द, काटकपणा आणि आत्मविश्वास यांची खरी परीक्षा होती. प्रत्येक पावलावर मन सांगत होतं की आता थांबावं, सोडून द्यावं; पण पुढचं पाऊल टाकत राहणं हाच एकमेव पर्याय होता. इथे येऊन रन करायची असेल तर केवळ प्रॅक्टिस पुरेशी नाही. उंचीशी आणि वातावरणाशी एकरूप होण्यासाठी acclimatisation आणि शेवटपर्यंत give up न करण्याची मानसिकता अत्यंत महत्त्वाची आहे,” असे प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले. खार्दुंगला टॉपनंतर बदलते हवामान, तापमानातील चढ-उतार आणि तुलनेने खडतर रस्ते यामुळे पुढील प्रवासही आव्हानात्मक होता. या संपूर्ण अनुभवातून धावपटूंच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेता आल्याचे देवस्थळी यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg