loader
Breaking News
Breaking News
Foto

आरवली रेल्वे स्थानक झाले चकाचक; प्रवाशांमध्ये समाधान; नवीन स्वच्छतागृह, प्लॅटफॉर्मवर लादी आणि रेल्वे ट्रॅकवरील झाडी हटवली

संगमेश्वर (प्रतिनिधी) - आरवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे स्थानक आता चकाचक झाले आहे. नवीन स्वच्छतागृहाची उभारणी, प्लॅटफॉर्मवर लादी बसविणे तसेच रेल्वे ट्रॅकवर आलेली झाडी तोडण्यात आल्याने प्रवाशांसह ग्रामस्थांकडून रेल्वे प्रशासनाबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून आरवली रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहाचा पाईप चोंदल्याने दुर्गंधीयुक्त सांडपाणी प्लॅटफॉर्मवर वाहत होते. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रेल्वे प्रवासी संयुक्ता संजय जड्यार (रा. खेरशेत) या प्लॅटफॉर्मवरून चालत असताना सांडपाण्यावरून पाय घसरून पडल्या. या दुर्घटनेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर धनावडे, माजी पोलीस पाटील दत्ताराम लांबे, मुरडवचे माजी सरपंच मुकेश राजाराम चव्हाण, पोलीस पाटील राजेंद्र सखाराम मेणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष दशरथ पवार, तसेच आरवलीतील सामाजिक कार्यकर्ते सुनील भुवड, विजय चव्हाण, अमोल बाटे आणि रामदास गर्दे यांनी स्थानकाची पाहणी केली. पाहणीदरम्यान स्वच्छतागृहातून दुर्गंधीयुक्त सांडपाणी व किडे प्लॅटफॉर्मवरून वाहत असल्याचे निदर्शनास आले. या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त करून संबंधितांनी रत्नागिरी येथील क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश दा. बापट यांची भेट घेतली. त्यावेळी नवीन व सुसज्ज स्वच्छतागृह बांधणे, प्लॅटफॉर्मवर लादी बसवणे, दुसर्‍या बाजूला नवीन प्लॅटफॉर्म उभारणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उड्डाणपूल बांधणे तसेच रिक्षा स्टँड परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी गटार व्यवस्था करणे, अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. समस्या तातडीने सोडविल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.

टाईम्स स्पेशल

या मागण्यांची रेल्वे प्रशासनाने दखल घेत स्थानकात नवीन स्वच्छतागृह उभारले. तसेच संपूर्ण प्लॅटफॉर्मवर लादी बसविण्यात आली आहे. यापूर्वी प्लॅटफॉर्मवर चिखल व गवत असल्याने प्रवाशांना सर्प-विंचू यांसारख्या जीवांपासून धोका निर्माण होत होता. लादी बसविल्यामुळे ही गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. रेल्वे ट्रॅकवर आलेली झाडीही हटविण्यात आली असून प्रवाशांसाठी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे. या सुविधांमुळे आरवली रेल्वे स्थानकाचे रूप पालटले असून प्रवाशांना अधिक स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन त्या तातडीने दूर केल्याबद्दल तसेच समस्यांचा सातत्याने पाठपुरावा करणार्‍या बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे व सहकार्‍यांचे प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg